अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने हे करा...

Share:
Main Image
Last updated: 31-Jan-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) ३१ जानेवारी - ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ही अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून ती विनाअडथळा प्राप्त करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले 'आधार प्रमाणीकरण' तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केले आहे.

शासनाच्या दिनांक ७ डिसेंबर २०२५ च्या निर्णयान्वये नुकसान भरपाई वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. ही प्रक्रिया बायोमेट्रिक किंवा आधार लिंक असलेल्या मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे पूर्ण करता येईल. शासनाकडून मिळणारी मदत केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यातच जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले असल्याची खात्री करून घेणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत, केवळ त्यांचेच आधार प्रमाणीकरण प्रणालीद्वारे स्वीकारले जाईल.

कोणताही पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने हे आवाहन केले आहे. तांत्रिक अडचण आल्यास संबंधित ग्राममहसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आधार प्रमाणीकरण विहित वेळेत न केल्यास संबंधित शेतकऱ्यांचे अनुदान शासनाकडे परत जमा करण्यात येईल व त्यानंतर याबाबतची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असेही अकोले तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.