मुंबई, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या राजकीय वारसाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती आणि अजितदादांच्या रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील जागांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर नेते मुंबईकडे रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आधी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर हे शिष्टमंडळ थेट मुंबईला रवाना झाले. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
सुनेत्रा पवारांकडे मोठी जबाबदारी?
या बैठकीत प्रामुख्याने अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती आणि उपमुख्यमंत्रीपद यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत, मात्र त्यांना विधानसभेवर निवडून आणून सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.
या मुद्द्यांवर झाली चर्चा:
मंत्रिमंडळ फेरबदल: अजित पवारांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते राष्ट्रवादीकडेच राहावे, असा आग्रह नेत्यांनी धरला आहे.
राजकीय वारसा: अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
महायुतीची रणनीती: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय कसा राखायचा, यावरही प्राथमिक चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते. तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर शनिवारी यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या अकाली जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असताना, सुनेत्रा पवार यांना पुढे करून पक्ष सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.