नाशिक, (प्रतिनिधी) २६ जानेवारी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सतर्कतेमुळे घारीचे प्राण वाचले आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी प्रसाद आज सकाळी आले होते. त्याचवेळेस त्यांना आवारातील उंच झाडावरून पक्ष्याचा आवाज ऐकू आला. इतर वेळेपेक्षा हा आवाज वेगळा होता.
जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या संवेदनशील मनाला हा आवाज वेगळा वाटला. एवढ्या धावपळीत ही त्यांनी झाडाकडे बारकाईने पाहिले असता एका घारीच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बैरागी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने या घारीची मांजातून सुटका करीत तिला मुक्त केले.
यापूर्वीच जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.