नागपूर, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - राजकारणात सध्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गळेकापू स्पर्धा सुरू असताना, नागपूरच्या राजकीय पटलावर एक धक्कादायक पण विचार करायला लावणारी घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. येत्या १३ मे रोजी आमदारकीची मुदत संपल्यानंतर आपण कोणतेही पद स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'सध्याची राजकीय संस्कृती बदलली'
आमदार संदीप जोशी यांनी केवळ निवृत्ती जाहीर केली नाही, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत परखड भाष्यही केले आहे. पत्राद्वारे आपली भूमिका मांडताना त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, वाढते पक्षांतर आणि या धामधुमीत मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत खंत व्यक्त केली आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत तत्त्वांना बगल दिली जात असल्याचे संकेत त्यांच्या पत्रातून मिळत आहेत.
फडणवीसांचे 'संकटमोचक' म्हणून ओळख
संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि भाजपच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. फडणवीसांचे 'संकटमोचक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने अशा प्रकारे अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
"सध्याच्या राजकीय संस्कृतीत निष्ठावान कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. १३ मे रोजी आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर मी कोणत्याही पदाच्या शर्यतीत नसेल."
— संदीप जोशी, आमदार (भाजप)
पत्रातून व्यक्त केली मनातील खंत
जोशी यांनी लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात त्यांनी केवळ निवृत्तीचा उल्लेख केला नसून, सध्याच्या बदलत्या राजकारणाचे वास्तव समोर ठेवले आहे. ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले, त्यांना सध्याच्या परिस्थितीमुळे डावलले जात असल्याची भावना त्यांच्या या निर्णयामागे असल्याचे बोलले जात आहे.
संदीप जोशी यांच्या या निर्णयामुळे नागपूर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार असून, त्यांच्या या 'निवृत्ती'मागचे खरे कारण आणि भविष्यातील राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.