सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले... शिक्षक थेट आदिवासी पाड्यांवर पोहचले... नेमकं काय घडलं?

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

कळवण, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी आणि त्यांचा शिक्षणातील खंड टाळण्यासाठी कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक विशेष पुढाकार घेतला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने थेट गावागावात जाऊन विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या घरी भेट देत प्रभावी समुपदेशन सुरू केले आहे. या उपक्रमामुळे पालकांमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना तातडीने शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रकल्पाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या आदेशान्वये विशेष मोहीम

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या विशेष निर्देशानुसार ही मोहीम राबवली जात आहे.

शिक्षक व कर्मचारी प्रत्यक्ष पालकांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच विसापूर शासकीय आश्रमशाळेत मिळणाऱ्या मोफत शैक्षणिक सुविधा, चांगला आहार आणि सुरक्षित निवासी व्यवस्थेची सविस्तर माहिती पालकांना दिली जात आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नियमित उपस्थिती किती महत्त्वाची आहे, हे सांगतानाच पालकांच्या अडचणीही समजून घेतल्या जात आहेत.

'विद्यार्थी केंद्रबिंदू' मानून शिक्षक मैदानात

Advertisement

आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी 'विद्यार्थी हाच केंद्रबिंदू' मानून काम सुरू केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही कारणाने खंडित होऊ नये आणि आश्रमशाळेवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी ही टीम सातत्याने प्रयत्न करत आहे. शिक्षकांनी थेट दारात येऊन साधलेल्या या संवादामुळे पालक आणि शाळा यांच्यातील नाते अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे.

पालकांकडून उपक्रमाचे कौतुक; आजपासूनच मुले शाळेत!

शिक्षकांनी घरोघरी जाऊन केलेल्या या आत्मीय समुपदेशनामुळे पालक भावूक व प्रेरित झाले आहेत. “आम्ही आमच्या मुलांना आजपासूनच पुन्हा शाळेत पाठवत आहोत,” अशी ग्वाही अनेक पालकांनी दिली आहे.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि शैक्षणिक निष्ठेचे परिसरातील नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक केले जात असल्याचे प्रकल्पाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.