नाशिक, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - लहान मुलांचे भांडण सोडवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना गंगापूररोडवरील कॅनडा कॉर्नर भागात घडली आहे. वाद सोडवल्याच्या रागातून तीन जणांच्या टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाने प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्यामुळे तो बालंबाल बचावला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
विश्वजीत अशोक पांडे (रा. मॅरेथॉन चौक, मुरकुटे कॉलनी, गंगापूररोड) असे या हल्ल्यात बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वजीत आणि त्याचा मित्र शनिवारी (दि. १२) कॅनडा कॉर्नर भागात गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोघे मित्र 'ओरा शोरूम'च्या समोरून पायी जात असताना काही अल्पवयीन मुले आपापसात वाद घाजत भिडली होती.
हा वाद पाहून विश्वजीत पांडे यांनी नागरिक म्हणून तिथे मध्यस्थी करण्याचा आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने टोळक्यामधील तीन जणांनी पांडे यांच्यावर अचानक धारदार चॉपरने प्रतीहल्ला केला.
प्रतिकारामुळे टळला अनर्थ
आरोपींनी प्राणघातक हल्ला केला असला, तरी विश्वजीत पांडे यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने प्रतिकार केल्यामुळे ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे कॅनडा कॉर्नर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.