मनोहर शिंदे, (नाशिक) ९ सप्टेंबर - नाशिक शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून’ मोहिमेचा ११ वा टप्पा युवाशक्तीच्या जल्लोषात पार पडला. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (CHME) ऐतिहासिक भोसला मिलिटरी कॉलेजच्या परेड ग्राउंडवर ‘कुंभ युवा संवाद’ आणि ५ हजार देशी वृक्ष वाटपाचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी उपस्थितांना ‘Gen-Z बरोबरच Gen-G’ म्हणजेच ‘Generation-Green’ असा नवा नारा देत हरित नाशिकचा संकल्प सोडला.
या कार्यक्रमाला ५ हजारांहून अधिक विद्यार्थी, क्रीडापटू, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘स्वच्छ व हरित कुंभ’ आणि ‘नशामुक्त भारत’चा संकल्प
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपूर्ण देशात ‘स्वच्छ व हरित कुंभ’ म्हणून आदर्श ठरावा, यासाठी युवाशक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नशामुक्त भारत’ साकारण्यासाठी युवकांनी पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीची चळवळ घराघरांत पोहोचवावी. ‘एक युवक, एक झाड’ आणि ‘व्यसनमुक्त युवा’ या संकल्पनेतून कुंभमेळा हरित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीचे धडे दिले, तर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती देत ‘कुंभमेळा युवा वॉरियर्स’ची फळी उभी केली जाणार असल्याचे सांगितले.
‘भू-प्रहरी’ व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा गौरव
पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान देणाऱ्या ५ 'भू-प्रहरी' आणि पर्यावरण जनजागृती करणाऱ्या युवा सोशल मीडिया प्रभावकांचा (Influencers) मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रातिनिधिक स्वरूपात २५ विद्यार्थ्यांना देशी वृक्षांचे वाटप करण्यात आले.
नाशिक महापालिका उद्यान विभागाला सीएसआर (CSR) निधीतून 'काँक्रीट ब्रेकर' सुपूर्द करण्यात आले.
वृक्षवाटपाचा ६० हजारांचा टप्पा पूर्ण
‘मिशन GREEN मान्सून’ अंतर्गत आतापर्यंत नंदिनी नदीकाठ, दऱ्याई माता परिसर, सिन्नर एमआयडीसी, एकलहरे आणि गंगापूर धरण परिसरात ५५,२७५ देशी वृक्षांची लागवड व वाटप झाले होते. आजच्या ५ हजार वृक्षवाटपामुळे या मोहिमेने ६० हजारांचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. पुढील टप्प्यात शहरातील इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि सेल्फीचा जल्लोष
संपूर्ण ‘वंदे मातरम्’च्या राष्ट्रभक्तीपूर्ण जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. औपचारिक कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत सेल्फी काढल्यामुळे तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला होता.