सिंहस्थात पर्वणीच्या दिवशी किती कोटी भाविक येणार? गर्दीचे व्यवस्थापन कसे करणार?

Share:
Main Image
Last updated: 09-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन सुलभ व्हावे, यासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांचा सहभाग आणि समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभमेळा काळात भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तयार करण्यात आलेल्या नियोजन आराखड्यात शेजारील जिल्हा प्रशासनांची भूमिका निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नाशिक विभागासह पुणे, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमधील डांग व वलसाड जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष व व्हर्च्युअली उपस्थित होते.

व्यासपीठावर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, डांगचे जिल्हाधिकारी एन. डी. परमार, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन उपस्थित होते.

गर्दीचे व्यवस्थापन आणि होल्डिंग एरियाचे नियोजन

पर्वणीच्या काळात धुळे, पालघर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मार्गांवरून येणाऱ्या भाविकांमुळे तासनतास वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी संलग्न जिल्ह्यांनी आपापल्या हद्दीत नियोजन करावे, असे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. नाशिक शहरात अतिगर्दी झाल्यास भाविकांना तात्पुरते थांबवण्यासाठी (Holding Areas) महामार्गालगतच्या जागा निश्चित कराव्यात. या ठिकाणी भाविकांसाठी:

पिण्याचे पाणी आणि अन्नछत्राची सोय

स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचार/आरोग्य सुविधा

Advertisement

नाशिकमधील गर्दी ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्याचे नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले.

८ ते १० कोटी भाविक येण्याचा अंदाज: कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

मागील कुंभमेळा आणि प्रयागराज येथील गर्दीचा अनुभव लक्षात घेता, यंदा नाशिकमध्ये ८ ते १० कोटी तर त्र्यंबकेश्वर येथे ४ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. अमृतस्नान पर्वणीच्या दिवशी नाशिकमध्ये १.५ कोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ७५ लाख भाविक एकत्र येण्याची शक्यता आहे.

गर्दी नियंत्रणासाठी प्राधिकरणातर्फे खालील विशेष योजना आखण्यात आल्या आहेत:

१. वाहतूक नियंत्रण: खासगी व परराज्यातील वाहनांना शहरात मर्यादित प्रवेश असेल. नियंत्रित क्षेत्रात एसटी महामंडळाची शटल बस सेवा चालवली जाईल.

२. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती: प्रत्येक संलग्न जिल्ह्याने वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत.

३. रस्ते व आपत्कालीन व्यवस्था: घाट रस्ते सुस्थितीत ठेवणे आणि पर्यायी मार्ग तयार ठेवण्याच्या सूचना रेल्वे, महामार्ग पोलीस आणि परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत.

या बैठकीत धुळे, जळगाव, नंदुरबार, वलसाडचे जिल्हाधिकारी तसेच पुणे व भुसावळचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक (DRM) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

Advertisement

Comments

No comments yet.