नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - ठक्कर बाजार बस स्थानकात एसटी बसच्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ६ सप्टेंबर) सायंकाळी घडली. चालकाने बस निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण उत्तम वारुंगशे (वय २१, रा. एसटी कॉलनी, नाशिक रोड) हे त्यांची आई, मानलेली मावशी ज्योती रामभाऊ शेलार आणि त्यांच्या दोन मुली आकांक्षा व वैष्णवी यांच्यासह त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी रविवारी सायंकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्थानकात आले होते.
त्याचवेळी बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या बसच्या (क्र. MH 40 Y 5662) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बस अविचाराने व निष्काळजीपणे चालवली. या बसची जोरदार धडक बसल्याने आकांक्षा शेलार ही खाली पडली. दुर्दैवाने, बसचे डाव्या बाजूचे पाठीमागचे चाक तिच्या कमरेवरून गेल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ तीव्र खळबळ उडाली होती.
याप्रकरणी करण वारुंगशे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी बस चालक भिका एकनाथ अहिरे (वय ४५, रा. पंचवटी, नाशिक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या (MV Act) कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल (गु. र. क्र. २२७/२०२६) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत.