अक्षय काळे, (मुंबई) ३० ऑगस्ट - नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण महापुराच्या पार्श्वभूमीवर, तेथे धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य आणि केंद्र सरकारची विविध यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ जणांशी प्रशासनाचा थेट संपर्क झाला आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे स्वगृही आणण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मंत्रालयातील २४ तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मदतकार्याचा समन्वय साधला जात असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने कार्यवाही सुरू आहे.
मदत आणि प्रवासाचे नियोजन (महत्त्वाचे मुद्दे):
१४३ नागरिक परतण्याच्या मार्गावर:
सागा येथून ४१ नागरिक आज परतले असून, १०६ नागरिकांचा समूह बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे. हे सर्वजण रविवारी पहाटे नागपूरला पोहोचतील.
४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत प्रवेश:
अहिल्यानगर (संगमनेर) येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील ४५ नागरिक चितवन येथे अडकले होते. काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने त्यांना लुंबिनी मार्गे भारताच्या हद्दीत सुरक्षितपणे आणण्यात आले आहे. हे नागरिक अयोध्या येथे पोहोचल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवले जाईल.
चीनमधून १४९ भारतीयांचा नेपाळमध्ये प्रवेश:
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधून १४९ भारतीय पर्यटक नेपाळच्या हद्दीत सुरक्षितपणे आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असून, त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पोहोचवण्याची कार्यवाही सुरू आहे.
मुंबईतील पर्यटकांसाठी प्रयत्न:
बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून अंधेरीचे लक्ष्मीनारायण आचार्य व त्यांच्या ग्रुपशी मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिका आपत्कालीन कक्षाकडून (BMC EOC) त्यांच्या नातेवाईकांशी सतत संवाद साधला जात आहे.