नाशिककरांसाठी मोठी बातमी... समृद्धी महामार्ग आणखी जवळ... येथे होणार नवे कनेक्टर...

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २६ ऑगस्ट - नाशिक शहराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी पांढुर्ली येथे नवीन कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. नाशिक शहरापासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या नव्या कनेक्टरमुळे नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी आता ४० ते ४५ किलोमीटरचा लांबचा फेरा मारावा लागणार नाही. सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्रवाशांसाठी खुला करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) नियोजन आहे.

सध्याच्या त्रासातून आणि दुहेरी टोलमधून सुटका

सध्या नाशिककरांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी इगतपुरी (४५ किमी) किंवा भरवीर खुर्द (४४ किमी) येथील इंटरचेंज वापरून समृद्धी महामार्गावर जावे लागते, तर नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी सिन्नर (४० किमी) येथील मार्ग वापरावा लागतो.

टोलचा दुहेरी भुर्दंड: इगतपुरी मार्गाने जाताना नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर टोल भरावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा समृद्धी महामार्गाचा वेगळा टोल द्यावा लागतो.

भरवीर खुर्द मार्गावर ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

नव्या पांढुर्ली कनेक्टरमुळे अंतर थेट २८ किमीवर येणार असून दुहेरी टोलच्या भुर्दंडातून प्रवाशांची सुटका होणार आहे.

Advertisement

प्रकल्पाचे स्वरूप आणि नियोजन

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या प्रकल्पाला गती दिली आहे.

पहिला टप्पा (दोन पदरी मार्ग): सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्रवाशांची ये-जा सुलभ व्हावी म्हणून अल्प भूसंपादनात सुरुवातीला दोन पदरी रस्ता तयार केला जाईल.

दुसरा टप्पा (चार पदरी विस्तार): त्यानंतर अतिरिक्त जमीन संपादित करून हा रस्ता चार पदरी (4-lane) करण्यात येईल.

नाशिक-पांढुर्ली रस्त्याचे रुंदीकरण: यासोबतच नाशिक शहर ते पांढुर्ली या मुख्य रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठीही स्वतंत्र प्रकल्पावर काम सुरू आहे.

सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम टप्प्यात असून लवकरच राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळून कामाला सुरुवात होईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची वाहतूक सुरळीत ठेवण्यात हा पांढुर्ली कनेक्टर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.

Advertisement

Comments

No comments yet.