मुंबई, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - प्री-मॅट्रिक (इ. 9 वी व 10 वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11 वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग व शिष्यवृत्ती विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. भारत सरकारकडून पीएम-वायएएसएएसव्हीआय (यंग आचीव्हर्स स्कॉलरशिप ॲवार्ड स्कीम फॉर व्हायब्रेट इंडिया) या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक (इ. 9 वी व 10 वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11 वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इ. 9 वी व 10 वी) अंतर्गत अटी: लागू प्रवर्ग : ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी, एसबीसी शाळा शासकीय मान्य असणे आवश्यक, वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 2,50,000/-, किमान उपस्थिती 75 टक्के, शिष्यवृत्ती रक्कम रुपये 5000/- वार्षिक दोन मुलांपर्यंत लाभ (मुलींना मर्यादा नाही)
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती अंतर्गत अटी: लागू प्रवर्ग : ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी, एसबीसी, वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 2,50,000/-, किमान उपस्थिती 75 टक्के, एफआरए/मान्य प्राधिकरणांतर्गत अभ्यासक्रमांसाठीच शिष्यवृत्ती रक्कम डीबीटी द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार-लिंक बँक खात्यात, अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास शिष्यवृत्ती रक्कम परत करावी लागेल
अर्ज प्रक्रिया: विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र, जातवैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार-लिंक बँक खाते, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार प्रमाणीकरणासह 75 टक्के उपस्थितीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच सर्व पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत, असे आवाहनही इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहर सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.