अक्षय काळे, (मुंबई) २२ ऑगस्ट - देशातील साखरेच्या साठ्याबाबत केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. "सरकारी आकडेवारीनुसार गणितात तब्बल ४८ लाख टन साखरेची तफावत आढळत असून, ही प्रचंड प्रमाणात असलेली साखर नेमकी गेली कुठे?" असा सवाल करत राजू शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे उत्तर मागितले आहे.
राजू शेट्टी यांनी मांडलेली सरकारी आकडेवारीची गणिती तफावत:
ऑक्टोबर २०२५ अखेर शिल्लक साठा: ४७ लाख टन
हंगाम २०२५-२६ मधील नवे उत्पादन: २९१ लाख टन
एकूण उपलब्ध साखर: ३३८ लाख टन
निर्यात झालेली साखर: ८ लाख टन
१ नोव्हेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान विक्रीस दिलेली परवानगी: २४७ लाख टन
३० ऑगस्टपर्यंत शिल्लक असायला हवी असलेली साखर: ८३ लाख टन
अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानुसार सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष शिल्लक साठा: केवळ ३५ लाख टन
४८ लाख टन साखर गायब; शेट्टींचे गंभीर आरोप:
सरकारी आकडेवारीनुसार शिल्लक राहिलेल्या ८३ लाख टनांपैकी केवळ ३५ लाख टन साखरेचीच नोंद दाखवली जात आहे. त्यामुळे उरलेली ४८ लाख टन साखर गायब झाल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.
या प्रकारामागे दोनच शक्यता असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे:
१. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये चोरट्या मार्गाने (स्मगलिंगद्वारे) साखरेची बेकायदेशीर निर्यात झाली असावी.
२. व्यापारी आणि साठेबाजांनी बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी ही साखर दाबून ठेवली असावी.
"हे सर्व आकडे सरकारनेच वेळोवेळी जाहीर केलेले असल्याने, या ४८ लाख टन साखरेचा हिशोब देण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचीच आहे," असे खुले आव्हान राजू शेट्टी यांनी दिले आहे.