अक्षय काळे, (मुंबई) २१ ऑगस्ट - नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये राज्यातील इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार इयत्तांचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानुसार 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ' (बालभारती) द्वारे या इयत्तांची नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी: राज्यात २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली; २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी व सहावीचा अभ्यासक्रम लागू होत आहे. पुढील टप्प्यात (२०२७-२८) पाचवी, सातवी, नववी व अकरावीचा नवा अभ्यासक्रम लागू होईल.
कामांचे नियोजन: बालभारतीकडून पाचवी, सातवी व नववीच्या पुस्तकांचे काम जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर अकरावीची पुस्तके तयार केली जातील.
परिणामकारकता तपासणी: राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत आतापर्यंत लागू झालेल्या नव्या पाठ्यपुस्तकांची परिणामकारकता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन केले जाईल. यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिली.