नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणारा प्रियकर अचानक बेपत्ता झाल्याने आणि प्रेयसीच्या वागणुकीत संशयास्पद बदल झाल्याने वाहनचालकाने थेट पोलीस ठाणे गाठले आहे. चालकाने व्यक्त केलेल्या संशयावरून प्रेयसीनेच मालकाचे अपहरण किंवा खून (घातपात) केल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
स्वराज्यनगर (पाथर्डी फाटा) येथे राहणारे वसंत गोरख सातपुते (३९) हे गेल्या काही दिवसांपासून अचानक गायब झाले आहेत. सातपुते हे संशयित महिला हसीना हबीब शेख हिच्यासोबत गेल्या १५-१६ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कचरू कडवे (रा. पेठ रोड) हे सातपुते यांच्याकडे अनेक वर्षांपासून चालक म्हणून काम पाहत आहेत.
उडवाउडवीची उत्तरे व संशयास्पद वर्तन: मालक अचानक दिसत नसल्याने चालक कचरू कडवे यांनी स्वराज्यनगर येथील घरी जाऊन हसीना शेख हिच्याकडे वारंवार चौकशी केली. मात्र, तिने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस तक्रारीस नकार: प्रियकर बेपत्ता होऊनही महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. चालकाने तिला तक्रार देण्याबाबत जाब विचारला असता, तिने उलट चालकालाच "माझ्याविरोधात तक्रार कर" असा सल्ला दिला.
घातपाताचा संशय: बेपत्ता झाल्यानंतरही प्रेयसीच्या वागण्यात आलेला अचानक बदल पाहता, तिनेच वसंत सातपुते यांचे अपहरण केले असावे किंवा त्यांचा खून करून घातपात घडवून आणला असावा, असा गंभीर संशय चालक कडवे यांनी व्यक्त केला आहे.
चालक कचरू कडवे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.