दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १७ ऑगस्ट - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. “टेंडरमध्ये २५ टक्के कमिशन घेण्याचा 'मातोश्री पॅटर्न' महाराष्ट्राला चांगलाच माहीत आहे. गटार, टॉयलेट आणि खड्ड्यांच्या प्रत्येक कामात पैसे खाण्याची परंपरा तुमचीच आहे,” असा थेट घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. संजय राऊत यांनी इतरांवर टीका करण्यापेक्षा मातोश्री पॅटर्न काय होता, हे एकदा महाराष्ट्राला स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यावरून आणि वक्तव्यांवरून जोरदार निशाणा साधला. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमधील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
उबाठा पक्षालाच मोठा खड्डा:
नाशिकमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासन सक्षम असून तेथे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
नाशिकची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी घेतली आहे.
नाशिकमध्ये जाऊन राजकीय नाटकीपणा करण्यापेक्षा संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील पडलेले मोठे खड्डे बुजवावेत आणि अख्खा पक्ष खड्ड्यात जाण्यापासून वाचवावा.
सत्ता व कमिशनखोरी बंद झाल्याने जळफळाट:
२५ वर्षे मुंबई महापालिकेत आणि अडीच वर्षे राज्यात सत्ता असताना लूट करून सोन्याची लंका उभी करण्यात आली.
अहंकार आणि कमिशनखोरीची ही 'सोन्याची लंका' लवकरच उद्ध्वस्त होईल.
सत्ता गेल्यामुळे आणि कमिशनखोरीची दुकाने बंद झाल्यामुळेच ठाकरे गटाचा जळफळाट होत आहे.
कुंभमेळा आणि हिंदुत्वावरून निशाणा:
नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात हजारो साधू-संत आणि लाखो हिंदू एकत्र येणार आहेत.
हिंदूंच्या या मोठ्या एकत्रिकरणाला विरोध करण्यासाठी आणि नाशिकला बदनाम करण्यासाठीच राऊतांचे आंदोलन सुरू आहे.
हिंदू समाजाने एकत्र येऊ नये आणि तो जातीजातींमध्ये विभागला जावा, हीच यांची मानसिकता आहे.
भाजपने स्पष्ट केले आहे की, विरोधकांनी कितीही 'जनाबगिरी' किंवा 'औरंगजेब फॅन क्लब' चालवण्याचा प्रयत्न केला, तरी आगामी कुंभमेळा अत्यंत भव्य आणि यशस्वीपणे पार पडेल.