नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. "आम्ही खड्ड्यांमध्ये पोहत पोहत नाशिकपर्यंत पोहोचलो आहोत," अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेशी सामना करणाऱ्या नाशिककरांच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची घोषणा केली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत त्यांनी एक गंभीर आकडेवारी मांडली. शहरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये भव्य मोर्चा
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने आज, सोमवारी नाशिकमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नाशिककरांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता स्वतःच्या हक्काच्या रस्त्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
सत्ताधारी भाजपवर निशाणा
यापूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करून शहरातील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर व प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही नाशिक गाठत या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच नाशिककरांवर ही वेळ आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात असून, आज निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.