एस.के. खेडकर, (नाशिक) १६ ऑगस्ट - नाशिक शहराच्या वाहतूक व्यवस्थेला सक्षम पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात ‘नाशिक रिंगरोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. मौजे आडगाव येथील गट क्रमांक १६७८ व १६९६ मधील आवश्यक जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) हा प्रकल्प राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जमीन संपादनाची कार्यवाही केली जात आहे. आडगाव येथील संबंधित जमिनींचे आवश्यक मूल्यांकन आणि प्रशासकीय मंजुरी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याला सुरुवात झाली आहे.
चार खातेदारांच्या जमिनींचा समावेश
या भूसंपादन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने आडगाव येथील चार खातेदारांच्या जमिनींचा समावेश आहे:
गट क्रमांक १६७८: सुधाकर वाळू देशमुख व संपत शंकर देशमुख
गट क्रमांक १६९६: अनिल शंकर देशमुख व अरुण वाळू देशमुख
सदर भूसंपादनाची कार्यवाही भूसंपादन अधिकारी (निफाड उपविभाग) आणि एमएसआयडीसी (MSIDC) यांच्या संयुक्त समन्वयातून पूर्ण केली जात आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेमचेंजर प्रकल्प
नाशिक रिंगरोड हा शहराच्या वाढत्या वाहतुकीला शिस्त लावणारा अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे. या परिक्रमा मार्गामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. तसेच शहराबाहेरून ये-जा करणारी अवजड वाहतूक थेट रिंगरोडवरून वळवली जाणार असल्याने प्रमुख मार्गांवरील कोंडी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.