पुढील ५ दिवस या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता...

Share:
Main Image
Last updated: 14-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनासह पुढील पाच दिवस म्हणजेच सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील तब्बल २७ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली आहे.

पावसाचा अंदाज आणि प्रभाव क्षेत्र:

२७ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस:

मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या २७ जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

९ जिल्ह्यांत उघडीप व हलका पाऊस:

Advertisement

उर्वरित मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूर या ९ जिल्ह्यांमध्ये मात्र केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

मान्सून सक्रिय होण्याची मुख्य कारणे:

१. मान्सूनच्या आसाची स्थिती: मान्सूनच्या ट्रफचे (अक्षाचे) पश्चिमेकडील टोक उत्तरेकडे तर पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे झुकले आहे. सध्या हा आस फिरोजपूर, मुझफ्फरनगर, बाराबंकी, देहरीवरून थेट वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचला आहे.

२. उभा ‘शिअर झोन’ (Shear Zone): महाराष्ट्राच्या २२° उत्तर अक्षवृत्तावर (नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यात) समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी उंचीवर पूर्व-पश्चिम वाऱ्याचा उभा शिअर झोन तयार झाला आहे. यामुळे हवेत चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण होऊन पावसाचा जोर वाढला आहे.

ऑगस्टच्या उर्वरित दिवसांतील पावसाची शक्यता:

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रातील मान्सूनच्या पश्चिमी वाऱ्यांना बळकटी मिळाली आहे. हे वारे अधिक दक्षिण-वायव्येकडे सरकल्यास ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.

Advertisement

Comments

No comments yet.