दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १२ ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत भरणाऱ्या प्रसिद्ध श्रावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.
यात्रेत दरवर्षी २ ते ३ लाख भाविक दाखल होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी खालील महत्त्वाच्या नियमांची घोषणा करण्यात आली आहे:
भाविकांसाठी मुख्य सूचना:
साहित्यावर मर्यादा: सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात बॅग किंवा पिशव्या नेण्यास सक्त मनाई आहे. भाविकांनी कमीत कमी साहित्य व मौल्यवान वस्तू सोबत आणणे टाळावे.
वाहनांसाठी नियोजन: सर्व वाहने केवळ अधिकृत वाहनतळावरच (पार्किंग) पार्क करावीत.
सतर्कता व सहकार्य: परिसरात कोणतीही बेवारस वस्तू दिसल्यास तिला स्पर्श न करता तातडीने पोलिसांना कळवावे. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
अफवांपासून सावध: भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे.