नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी शहरातील दोन वेगवेगळ्या भागांतील विवाहितांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी भद्रकाली आणि एमआयडीसी अंबड पोलीस ठाण्यात अनुक्रमे ५ जणांसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिठाईच्या दुकानासाठी मारहाण; ५ जणांवर गुन्हा
पहिली घटना गंजमाळ भागात उघडकीस आली. येथील २७ वर्षीय पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर २०२३ पासून तिचाल सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. विहीतगाव येथे राहणारा पती आणि सासरच्या ५ जणांनी 'मिठाईचे दुकान टाकण्यासाठी माहेरून पैसे आण' असा तगादा लावला होता. या कारणावरून महिलेला सतत शिवीगाळ व मारझोड करत तिचा शारीरिक अन् मानसिक छळ केला गेला. अखेर सासरच्या छळाला कंटाळून पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस हवालदार निंबाळकर पुढील तपास करत आहेत.
व्यवसायासाठी ५० हजार रुपयांची मागणी
दुसरा प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) रहिवासी असलेल्या विवाहितेसोबत घडला. माळेगाव (ता. सिन्नर) येथील सासरच्या मंडळींनी सन २०२४ पासून तिला त्रस्त केले होते. 'नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये', अशी मागणी करत सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला होता. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस जमादार चव्हाण तपास करत आहेत.