दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ८ ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी गावाला जोडणारा पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन पूल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आपत्तीग्रस्त आणि धोकादायक क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार हिरामण खोसकर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव आणि गटविकास अधिकारी सानप यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जांभाची वाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करणार
भूस्खलनाचा (Landslide) तीव्र धोका असलेल्या 'जांभाची वाडी' येथील ग्रामस्थांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी लवकरात लवकर पर्यायी जागेचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
अल्पबचत भवनात तहसील कार्यालयाचे उद्घाटन
दौऱ्यादरम्यान अल्पबचत भवनात तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या तहसील कार्यालयाचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार व उपनगराध्यक्षा पाटणकर उपस्थित होत्या.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम प्रगतीची पाहणी केली, व उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित स्थलांतरित इमारतीला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
?s=20