एस.के. खेडकर, (नाशिक) ७ ऑगस्ट - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील २० हजार ३४१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १७३ कोटी ६९ लाख ९३ हजार २८७ रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी ही माहिती दिली.
कर्जमुक्तीचा बँकानुसार असा मिळाला लाभ:
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCC): १२,३११ शेतकरी सभासद (रु. ८६ कोटी ७२ लाख ६५ हजार ५२८)
राष्ट्रीयकृत बँका: ८,०३० शेतकरी सभासद (रु. ८६ कोटी ९७ लाख २७ हजार ७५९)
पात्र शेतकऱ्यांना तातडीने नवे पीक कर्ज देण्याचे निर्देश
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान होऊन थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने आगामी खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे आवाहन
जिल्ह्यातील एकूण ६८ हजार ८५९ शेतकरी खातेदारांची माहिती पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने वर्ग केला जाईल. त्यामुळे सर्व उर्वरित शेतकऱ्यांनी ही प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.