मनोहर शिंदे, (नाशिक) ३० जुलै - शहरातील रस्त्यांवर पडलेले महाकाय खड्डे आता केवळ अपघाताचे कारण न ठरता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. अवघ्या चार ते पाच महिन्यांत खड्ड्यांमुळे चौथा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंबड एमआयडीसी परिसरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात उद्योजक निलेश कोतकर यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक महापालिकेत उमटले असून, महापौर दालनात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा अन् तुफान शाब्दिक चकमक उडाली.
"घरात दुःखाचा खड्डा पडला, आमचं सगळं संपलं!"
अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंटजवळ कामावरून घरी परतताना खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा कट लागून उद्योजक निलेश कोतकर हे खाली पडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, ३ वर्षांची मुलगी आणि बहीण असा परिवार आहे.
"खड्डे भरून निघतील, पण आमचा मुलगा परत येईल का? रस्ते नीट असते तर आमचा सत्यानाश झाला नसता," अशा शब्दांत निलेश यांच्या वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
"आता माझ्या ३ वर्षांच्या चिमुकल्या मुलीने 'बाबा' कोणाला म्हणायचे? महापालिकेने माझ्या व माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी तातडीने आर्थिक तरतूद करावी," अशी हृदयद्रावक मागणी निलेश यांच्या पत्नीने केली आहे.
महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे गट आक्रमक
या चौथ्या बळीनंतर ठाकरे गटाचे नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. नगरसेवकांनी थेट महापौर दालन गाठून सत्ताधारी शिंदे गट व प्रशासनाला जाब विचारला.
"सत्ताधाऱ्यांचे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा शब्द महापौरांनी दिला होता. मग आता ४ बळी गेल्यानंतरही कारवाई का नाही? महापौरांवर आणि आयुक्तांवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! सत्ताधाऱ्यांना जनतेसाठी भांडायचे असेल तर त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडून राजीनामे द्यावेत," — केशव पोरजे (नगरसेवक, ठाकरे गट)
दोषींवर कडक कारवाई होणार, कोणाचीही गय करणार नाही: मंत्री गिरीश महाजन
या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "नाशिकमध्ये खड्ड्यात पडून तरुणाचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी पालिका आयुक्त व महापौरांशी चर्चा केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर किंवा अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. शनिवारी (दि. १ ऑगस्ट) नाशिक येथे आयोजित बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून कठोर निर्णय घेतले जातील."
शिवसेनेतर्फे १ लाखांची मदत; पालिकेने मदत देण्याची मागणी
घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी कोतकर कुटुंबीयांना १ लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२६ रोजी 'शिवदुर्गा-शिवसंवाद दौऱ्या'दरम्यान शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत ही रक्कम सुपूर्द केली जाईल.
तसेच, "महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हे बळी जात आहेत. दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून महापालिकेने मृत कोतकर यांच्या कुटुंबाला तातडीने मोठी आर्थिक मदत दिली पाहिजे," अशी मागणी तिदमे यांनी केली.
असे गेले नाशिकमध्ये चार जीव (खड्ड्यांचे बळी):
२४ मार्च: प्रभाकर निकम
६ जून: प्रवीण गायकवाड
२५ जुलै: दीपाली बेळे
२८ जुलै: निलेश कोतकर
उद्योजक अन् कामगारांमध्ये भीतीचे सावट!
औद्योगिक वसाहतींमधील (MIDC) रस्त्यांच्या दुरवस्थेवर नाशिकमधील उद्योजकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे अनेक कामगारांना कायमचे अपंगत्व आले असून, सकाळी कामावर गेलेला कामगार संध्याकाळी सुखरूप घरी येईल की नाही, अशी भीती निर्माण झाल्याचे उद्योजकांनी म्हटले आहे.