नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २८ जुलै - आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे, लेणी आणि प्राचीन स्मारकांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याअंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
प्रमुख वारसा स्थळांचे रूप पालटणार
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर १६ विकास कामे (४ सुरू तर १२ प्रस्तावित) हाती घेण्यात आली आहेत:
प्रमुख स्थळे: त्र्यंबकेश्वर मंदिर, गायत्री व शिव मंदिरे, पांडवलेणी, अंजनेरी, जोडगा आणि अंकाई लेणी.
कशी असतील कामे?: मंदिरांच्या प्रवेशद्वारांचे संवर्धन, हेरिटेज रोषणाई, परिसराचे सुशोभीकरण, शास्त्रीय संवर्धन, बहुभाषिक माहिती फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची निर्मिती.
राज्य सरकारचे ३९.५१ कोटींचे १६ प्रकल्प
महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरातत्व विभागामार्फत ३९.५१ कोटी रुपयांच्या निविदा मूल्याचे एकूण १६ प्रकल्प राबवले जात आहेत.
यामध्ये नाशिकमधील ६ आणि त्र्यंबकेश्वरमधील ८ असंरक्षित वारसा स्थळांचे संवर्धन केले जात आहे.
नारोशंकर मंदिर, कुशावर्त कुंड, बिल्व तीर्थ आणि प्रयाग तीर्थ या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ठिकाणी जीर्णोद्धार आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
यंत्रणांमध्ये परस्पर समन्वय
गेल्या ५ वर्षांत ASI कडून नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा जास्त संवर्धन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, ASI, राज्य सरकारचे पुरातत्व विभाग आणि इतर स्थानिक यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करत आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी पुरेशा निधीची तरतूद असून कोणतेही प्रशासकीय अडथळे आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.