एस.के. खेडकर, (नाशिक) २५ जुलै - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्ह्याचा धडक दौरा करत एकीकडे शेतात उतरून भातलावणी केली, तर दुसरीकडे निफाड तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत बाधितांना धीर दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुरगाणा तालुक्यातील देवलदरी येथे भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून चिखलात उतरत भाताची लावणी केली. तसेच त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वितरण करण्यात आले. सुरगाणा सारख्या दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही समर्पित भावनेने काम करणाऱ्या संपूर्ण तालुका प्रशासनाचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
या दौऱ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
सायखेडा, चांदोरीत पूरपरिस्थितीची पाहणी
सुरगाणा दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुपारी निफाड तालुक्यातील सायखेडा व चांदोरी परिसराला भेट दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांशी थेट संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यावेळी खासदार भास्कर भगरे, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.
बालकलाकार गार्गी आहेरची भेट अन् पाठीवर कौतुकाची थाप
निफाड दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी 'सखे गं साजणी' या प्रसिद्ध मराठी व्हिडिओतील आणि सध्या दूरचित्रवाणी मालिकेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या गार्गी सागर आहेर या बालकलाकाराची भेट घेतली.
गार्गीच्या अभिनय कौशल्याचे आणि सामाजिक भान जपणाऱ्या कलागुणांचे कौतुक करत त्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवोदित कलाकारांचे यश समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.