नाशिक, (प्रतिनिधी) २३ जुलै - शहर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पुराची पातळी मोजणारा पारंपरिक मापदंड मानल्या जाणाऱ्या रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.
गोदाघाटावरील मंदिरे पाण्याखाली; विसर्गात वाढ
पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या सततच्या पावसामुळे गंगापूर धरणातून व इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे गोदाघाटावरील सर्व लहान-मोठी मंदिरे, दुकाने आणि परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. होळकर पुलाखालून आणि नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत असून गोदावरी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून होणाऱ्या विसर्गात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना, व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.