राज्यात पावसाचा जोर वाढणार की कमी होणार? असा आहे हवामानाचा अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जुलै - गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेला मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील मध्यम ते मुसळधार पाऊस पुढील पाच दिवस, म्हणजेच आषाढी एकादशीपर्यंत (शनिवार, २५ जुलै) कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः २२ आणि २३ जुलै रोजी पावसाचा जोर सर्वाधिक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे (IMD) निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

२६ जुलैपासून पाऊस घेणार विश्रांती

पंढरपूर यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीनंतर, म्हणजेच रविवार, २६ जुलै (द्वादशी) ते ३१ जुलै दरम्यान पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

१८ जिल्ह्यांत उघडीप: मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या १० जिल्ह्यांसह मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांमध्ये पुढील सहा दिवस काहीशी उघडीप पाहायला मिळेल.

कोकण व विदर्भात पाऊस सुरूच: मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि विदर्भात मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.

पावसाचा जोर का कमी होणार?

हवामान विभागाच्या विश्लेषणानुसार वातावरणात खालील महत्त्वाचे बदल होत आहेत:

Advertisement

कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे: महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील हवेच्या कमी दाबाचा आस सरासरी जागेवरून उत्तरेकडे (उत्तर प्रदेशाकडे) सरकणार आहे.

मान्सून वारे कमकुवत: बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशकडे सरकल्याने अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतील.

या दोन्ही घटकांमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलै अखेरपर्यंत पावसाची तीव्रता कमी होऊन उघडीप राहील.

पुढील पावसाची शक्यता अन् धरण साठा

"ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होईल, याविषयीची स्थिती २ ऑगस्ट (संकष्ट चतुर्थी) दरम्यान निर्माण होणाऱ्या वातावरणीय प्रणालीच्या आधारे स्पष्ट होईल."

— माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ (IMD, पुणे)

दरम्यान, जुलै महिन्यात (२ ते ८ जुलै आणि १७ ते २५ जुलै) झालेल्या पावसामुळे धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या जरी पाणी साठ्यात मोठी वाढ झाली नसली, तरी मान्सूनचा काळ लक्षात घेता ऑक्टोबर अखेरपर्यंत भू-जलपातळी आणि धरणातील साठ्यात समाधानकारक वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.