मुंबई, (प्रतिनिधी) १९ जुलै - देशातील तरुणांमधील कल्पकता, कौशल्ये आणि नवोन्मेषाला (Innovation) चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' (WAVES-वेव्ह्ज) या मंचा अंतर्गत 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' (CIC) सीजन २ ची घोषणा करण्यात आली असून, यासाठी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योग संघटना, संस्था आणि प्रतिष्ठानांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत ५० हून अधिक आव्हाने राबवण्याचे नियोजन असून, निवडलेल्या प्रत्येक यशस्वी आव्हानासाठी मंत्रालयाकडून १ कोटी रुपयांपर्यंतचे एकरकमी अनुदान मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा संगम
'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या दुसऱ्या हंगामाचा मुख्य उद्देश उद्योगांच्या नेतृत्वाखाली आणि सरकारच्या सहकार्याने देशातील सर्जनशील प्रतिभेचा शोध घेणे हा आहे. यामध्ये खालील उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे:
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल माध्यमे
ॲनिमेशन, व्हीएफएक्स (VFX) आणि कॉमिक्स
ऑनलाइन सोशल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स
एक्सआर/एआर/व्हीआर (XR/AR/VR)
चित्रपट, प्रसारण, संगीत आणि नृत्य
या आव्हानातील विजेत्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे थेट प्रदर्शन 'वेव्ह्ज २०२७' मधील 'क्रिएटोस्फिअर' येथे भरवण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत
माध्यम आणि करमणूक (M&E) क्षेत्रातील इच्छुक संस्थांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक स्वतंत्र आणि पारदर्शक सामायिक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. संस्था आपले प्रस्ताव https://wavesbazaar.com/create-india-challenge/season2/ifp या ऑनलाइन पोर्टलवर किंवा अधिकृत क्यूआर (QR) कोड स्कॅन करून ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करू शकतात.
'क्रिएट फॉर द वर्ल्ड' संकल्पनेला गती
पंतप्रधानांच्या "क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड" (भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा) या संकल्पनेला गती देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सीझन १ चे यश आणि सीझन २ चा पुढचा टप्पा
'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या पहिल्या हंगामात उद्योगांच्या नेतृत्वाखाली ३३ आव्हाने यशस्वीपणे पार पडली होती. आता सीझन २ मध्ये याची व्याप्ती वाढवून ५० पेक्षा जास्त आव्हाने घेतली जातील. यामुळे तरुणांना सुनियोजित मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कौशल्य वाढवण्याच्या थेट संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भारताची सर्जनशील परिसंस्था अधिक मजबूत होईल.