लाखो एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री... तिकीट दराबाबत मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 16-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ जुलै - उन्हाळ्यातील हंगामी भाडेवाढ रद्द होऊन तिकीट दर पूर्ववत होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने भाडेवाढ मागे घेण्याऐवजी, उलट १३.५० टक्के भाडेवाढीचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. आज, बुधवारी होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) महत्त्वपूर्ण बैठकीत या भाडेवाढीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मंजुरी मिळताच या नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे.

३.५० टक्क्यांची अतिरिक्त भर

राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर त्याला १५ जुलैपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आज (बुधवारी) संपत आहे. मात्र प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी आता थेट १३.५० टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या प्रवासी १० टक्के वाढीव दराने तिकीट खरेदी करत आहेत, त्यात आता आणखी ३.५० टक्क्यांची अतिरिक्त भर पडणार आहे. प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या हंगामात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिलेली आहे.

तिकीट दर आता 'पाच रुपयांच्या पटीत'; सुट्ट्या पैशांचा वाद मिटणार

यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये जेव्हा १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती, तेव्हा तिकीट दर एक रुपयाच्या पटीत ठेवण्यात आले होते. यामुळे चिल्लर पैशांवरून वाहक (कंडक्टर) आणि प्रवाशांमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर वादाच्या घटना घडत होत्या. या तक्रारींची दखल घेत, महामंडळाने यंदाची भाडेवाढ 'पाच रुपयांच्या पटीत' ठेवण्याची शिफारस केली आहे. यामुळे सुट्टे पैसे बाळगण्याची प्रवासी आणि वाहक दोघांचीही चिंता मिटणार आहे.

भाडेवाढ का आवश्यक? महामंडळाची भूमिका

Advertisement

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील कारणांमुळे ही भाडेवाढ करणे गरजेचे झाले आहे:

कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत वाढ: एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, त्याची भरपाई या भाडेवाढीतून केली जाईल.

डिझेल आणि सुट्ट्या भागांचे वाढते दर: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. तसेच बसगाड्यांचे सुट्टे भाग आणि टायरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

स्वनिर्भरतेचे बंधन: राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च महामंडळाने स्वतःच्या उत्पन्नातूनच भागवावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; ३१ पैकी २२ विभाग तोट्यात

हंगामी भाडेवाढ लागू असूनही मे महिन्यातील महामंडळाचा जमा-खर्चाचा ताळेबंद चिंताजनक आहे. मे महिन्यात महामंडळाला १,०४७.१७ कोटी रुपये इतके वाहतूक उत्पन्न मिळाले, तर प्रत्यक्षात खर्चाचा आकडा १,०९६.०७ कोटी रुपये इतका होता. म्हणजेच महामंडळ अजूनही तोट्यातच धावत आहे. राज्यातील ३१ विभागांपैकी २२ विभागांना आपला दैनंदिन खर्च भागवण्याइतपतही महसूल मिळवता आलेला नाही. त्यामुळे केवळ सध्याची भाडेवाढ पुरेशी ठरत नसल्याने हा नवीन प्रस्ताव आणण्यात आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.