वर्धा, (प्रतिनिधी) ८ जुलै - येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) जवानांनी अत्यंत धैर्याने आणि प्रसंगावधान राखून एका स्थानिक नागरिकाचे प्राण वाचवले आहेत. कम्बाइन्ड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पच्या (CATC-605) कार्यालयाजवळील विहिरीत तब्बल १८ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला एनसीसीच्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले. नागपूरच्या 'क्रमांक ३ महाराष्ट्र (मुली) बटालियन एनसीसी'च्या जवानांनी ही थरारक बचाव मोहीम फत्ते केली. जीवन टाकसांडे (वय ५५, रा. सेवाग्राम, वर्धा) असे सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे.
असा लागला शोध
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन टाकसांडे हे २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विहिरीत पडले होते. रात्रभर ते विहिरीतच अडकून होते. दुसऱ्या दिवशी, ३ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता एका स्थानिक महिलेला विहिरीतून मदतीसाठी येणारा आवाज ऐकू आला. तिने तातडीने कॅम्प डेप्यूटी कमांडंट मेजर रिझू रावत यांची भेट घेऊन विहिरीत माणूस अडकल्याची माहिती दिली.
एनसीसी पथकाची तातडीने धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून मेजर रिझू रावत यांनी तात्काळ कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल प्रीती तिवारी यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर सुभेदार मेजर चंद्र भान सिंग, हवालदार (नर्सिंग असिस्टंट) जंगले जी.बी, नायक गणेश आणि ड्रायव्हर विशाल यांचे पथक सुरक्षा साधनांसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
दोरखंड आणि रेस्क्यू ट्यूबच्या साहाय्याने बचाव
एनसीसी पथकाने कॅम्पमधील दोरखंड आणि सुरक्षा साधनांचा वापर करून तातडीने बचावकार्य सुरू केले. सुरक्षेचा उपाय म्हणून एनडीआरएफ (NDRF) जवानांकडून 'रेस्क्यू ट्यूब' देखील मागवण्यात आली. अखेर १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता टाकसांडे यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना एनसीसी कॅम्पमध्ये आणून तातडीने प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देण्यात आली.
"एनसीसी कर्मचाऱ्यांमुळेच मला आज नवजीवन मिळाले आहे. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन करून विहिरीबाहेर काढले आणि माझे प्राण वाचवले. मी एनसीसी शिबिरातील सर्व जवानांचे मनापासून आभार मानतो."
— जीवन टाकसांडे (विहिरीतून वाचलेले नागरिक)
'एकता आणि शिस्त' ब्रीदवाक्य सार्थ!
लेफ्टनंट कर्नल प्रीती तिवारी यांनी या बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि नि:स्वार्थ सेवेचे विशेष कौतुक केले. एनसीसीचे 'एकता आणि शिस्त' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. एनसीसी ही केवळ सैनिकी प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून, समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीतही नेहमीच आघाडीवर असते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.