'या' तारखेपासून होणार मान्सूनचा पुढील प्रवास... शेतकऱ्यांसाठी असा आहे महत्त्वाचा सल्ला...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जुलै - गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर धुवांधार बॅटिंग करणाऱ्या मान्सूनचा जोर आता ओसरणार आहे. शुक्रवार, दि. १० जुलै (आषाढी एकादशी) पासून राज्यातील पावसाचा जोर लक्षणीय कमी होणार असून पुढील १० दिवस म्हणजेच १९ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात (मुंबई-कोकण वगळता) पावसाची मुख्यत्वे उघडीप राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला असून, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर ओसरण्याचे मुख्य कारण काय?

हवामान शास्त्रीय प्रणाल्यांनुसार, पावसाला पूरक ठरणारा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस आता सरासरी जागेवरून उत्तरेकडे म्हणजेच पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रातील समांतर कमी दाबाची द्रोणीय स्थिती (घळ) विरळ होऊन उथळ झाली आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण राजस्थानकडे जाताच विरळ होणार असल्याने, अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणारे बळकट मान्सून वारे आता कमकुवत झाले आहेत.

पुढील १० दिवस वातावरण कसे असेल?

१० ते १९ जुलै दरम्यान मुंबईसह कोकणात पावसाची तीव्रता कमी होऊन केवळ हलक्या सरी येतील. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी उघडझाप पाहायला मिळेल. स्थानिक भौगोलिक रचनेनुसार काही भागांत स्वच्छ सूर्यप्रकाशही पडू शकतो. या उघडिपीच्या काळात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेले म्हणजेच २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान राहील.

धरण साठ्यात 'श्रीगणेश'; २० जुलैनंतरचा अंदाज १७ ला स्पष्ट होणार

चालू मोसमी पावसाने राज्यातील धरणे व जलाशयांमध्ये पाणीसाठ्याचा 'श्रीगणेश' केला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील झडीचा पाऊस भूजल पातळी आणि धरणांमधील साठा वाढवण्यास मदत करेल. ऑक्टोबर अखेरपर्यंत पाणी पातळीत चांगली वाढ अपेक्षित आहे. तसेच, २० ते २४ जुलै दरम्यानच्या पुढील पावसाचा अंदाज १७ जुलैच्या वातावरणीय बदलांवरून स्पष्ट होईल. मान्सून येत्या ३ दिवसांत (१० जुलैपर्यंत) संपूर्ण देश काबीज करेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना: पेरणी कधी करावी?

राज्यातील ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमीन पोतानुसार, काळ्या कसदार जमिनीत किमान १० ते १२ सेमी आणि हलक्या जमिनीत १५ ते २० सेमी खोलीपर्यंत ओल (पेर-ओल) प्राप्त झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांतील प्रमुख पावसाची आकडेवारी (मिमी मध्ये):

Advertisement

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी सकाळपर्यंत राज्याच्या विविध जिल्ह्यांत नोंदवला गेलेला पाऊस खालीलप्रमाणे:

कोकण आणि मुंबई विभाग:

पालघर : २०३.३ मिमी (राज्यात सर्वाधिक) | ठाणे : ११६.४ मिमी | रायगड : १०८.७ मिमी | मुंबई उपनगर : ९०.४ मिमी | रत्नागिरी : ५८.४ मिमी | सिंधुदुर्ग : ३७.१ मिमी.

पश्चिम व मध्य महाराष्ट्र:

पुणे : ७०.९ मिमी | कोल्हापूर : ४७.७ मिमी | सातारा : ४६.६ | नाशिक : ३६ मिमी | अहिल्यानगर : २६.८ मिमी | सांगली : १३.४ मिमी | सोलापूर : ३.६ मिमी.

उत्तर महाराष्ट्र (खानदेश):

धुळे : ९.६ मिमी | जळगाव : ८.८ मिमी | नंदुरबार : ६.४ मिमी. (या भागात अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे).

मराठवाडा:

छत्रपती संभाजीनगर : १४.१ मिमी | धाराशिव : ६.८ मिमी | बीड : ६.२ मिमी | जालना : ५.६ मिमी | हिंगोली : १.९ मिमी | परभणी : १ मिमी | लातूर : ०.७ मिमी | नांदेड : ०.५ मिमी.

विदर्भ:

बुलढाणा : ४.८ मिमी | अकोला : ४.६ मिमी | अमरावती : २.३ मिमी | गडचिरोली : २ मिमी | गोंदिया : १.५ मिमी | भंडारा : १.४ मिमी | वाशिम : १.३ मिमी | नागपूर : १.१ मिमी | यवतमाळ : ०.८ मिमी | वर्धा : ०.८ मिमी | चंद्रपूर : ०.६ मिमी.

Advertisement

Comments

No comments yet.