मुंबई, (प्रतिनिधी) ३० जून - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक आणि अनपेक्षित अशी मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून थेट शिवसेना ठाकरे गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला (मविआ) आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा आजवरचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यापूर्वी शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना आपल्या बाजूने वळवून उपसभापतीपदाची संधी दिली होती. त्यानंतर आता थेट ठाकरे गटाच्या आघाडीच्या नेत्यालाच महायुतीकडून उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
१ जुलै रोजी निवडणूक
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रिक्त असलेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, १ जुलै २०२६ रोजी ही हाय-व्होल्टेज निवडणूक पार पडणार आहे.
अर्जाची मुदत: या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपले प्रस्ताव आणि लेखी सूचना मंगळवार, ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्याकडे सादर करायचे आहेत.
छाननी: त्यानंतर प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी आज, मंगळवार ३० जून रोजी दुपारी १ वाजता विधानभवनातील कक्ष क्रमांक ९०३ मध्ये होणार आहे.
'ती' खेळी पुन्हा यशस्वी होणार?
सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि मुंबईतील पक्षाचे महत्त्वाचे चेहरे म्हणून ओळखले जातात. मात्र, एकनाथ शिंदे यांनी थेट अहिर यांच्याच नावाची उमेदवारी घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नीलम गोऱ्हे यांच्याप्रमाणेच सचिन अहिर हे देखील महायुतीच्या गोटात सामील होणार का? की यामागे उपमुख्यमंत्र्यांची काही वेगळी रणनीती आहे, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद नियमातील नियम ७ मधील तरतुदींचा वापर करून ही निवडणूक घेतली जात असून, १ जुलै रोजी होणाऱ्या या मतदानात राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, हे स्पष्ट होईल.