राहुल नार्वेकरांना कागदावरून मराठी वाचता येत नाही आशाताईंचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला?

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ जून - विधानसभेत ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि थोर संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख 'दीनदयाल' केला, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. "नार्वेकरांनी काल आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढता जणू संमतीच दिली," अशा घणाघाती शब्दांत राज ठाकरेंनी संपूर्ण सभागृह आणि राज्य सरकारचा निषेध केला आहे.

कागदावरून मराठी वाचता येत नाही?

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात विधानसभा अध्यक्षांच्या भाषिक ज्ञानावर सडकून टीका केली. ते म्हणाले, "कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आले. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चालले असते, कारण त्यांचे मराठी कळाले नाही आणि त्या भाषा तशाच कोणाला समजत नाहीत. माणूस शिक्षित असला पाहिजे, पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभापतींना करून देणार आहेत का नाही?"

दीनानाथ मंगेशकर की दीनदयाल उपाध्याय?

शोकप्रस्तावादरम्यान झालेल्या अक्षम्य चुकीवर बोट ठेवत राज ठाकरे म्हणाले, "शोकांतिका अशी की, नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख 'दीनदयाल मंगेशकर' करत होते आणि वाट्टेल तसे मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत, ना दीनदयाल उपाध्याय माहीत आहेत. भाजपमध्ये जी काही खोगीरभरती सुरू आहे, त्यात त्यांची अवस्था 'तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे' अशी झाली आहे."

मुख्यमंत्र्यांचे विमान ५० हजार फुटांवर, तर फडणवीसांना गांभीर्य नाही!

Advertisement

"सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते की नाही माहीत नाही, पण असते तरी त्यांना काही फरक पडला असेल असे वाटत नाही. स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात 'गुलाबी आंखे' सारखी गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना राज्याच्या विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतोय आणि त्याचे गांभीर्य काय असते, हे समजायला हवे होते. पण त्यांचे म्हणणे सोपे आहे—सांगितलेली फोडाफोडीची कामे होत आहेत ना, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होतोय ना? बस झाले! दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान, काय फरक पडतो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याच्याशी देणेघेणे असण्याचे कारण नाही, कारण मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचे त्यांचे विमान ५० हजार फुटांवरून चालले आहे!"

— राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

अध्यक्षांच्या महान परंपरेचा विसर

विधानसभेला लाभलेल्या भूतपूर्व अध्यक्षांच्या परंपरेची आठवण करून देत राज ठाकरे यांनी सध्याच्या विधिमंडळ कामकाजाच्या सुमार दर्जावर टीका केली. "या सभागृहाला गणेश वासुदेव माळवणकर यांच्यासारखे अध्यक्ष लाभले, जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात, तिथले दत्तात्रय काशिनाथ कुंटे, अरुणभाई गुजराथी, बाळासाहेब भारदे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यासारखे दिग्गज अध्यक्ष या सभागृहाने पाहिले. ती परंपरा कुठे आणि सध्याची ही अवस्था कुठे? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचे चित्रण बघायला आणि ऐकायलाही सुमार वाटते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठी माणसाने विचार करण्याची वेळ

आपल्या भाषेची गळचेपी केंद्राकडून हिंदी लादून, परप्रांतीयांकडून आणि आता राज्याच्या विधिमंडळाकडूनही सुरू असल्याची चीड व्यक्त करत राज ठाकरेंनी जनतेला आवाहन केले. "महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवला आहे. शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र निषेध! मराठी माणसाने आता विचार करावा की, आपण कोणत्या पद्धतीची माणसे आणि सरकार निवडून देत आहोत," अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना पत्राद्वारे मांडल्या आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.