महापालिकेकडून नाशिक शहरात पाणीकपात जाहीर... आता या दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद...

Share:
Main Image
Last updated: 17-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील खालावलेला पाणी साठा आणि पावसाच्या विलंबाची शक्यता लक्षात घेता, नाशिक महानगरपालिकेने शहरात मोठी पाणी कपात जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, जून व जुलै महिन्यात दर शनिवारी तर ऑगस्ट महिन्यात थेट दोन दिवसाआड पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 'अल-निनो'च्या संकटामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता असल्याने नाशिककरांना आतापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

...म्हणून पाणी कपात अनिवार्य!

नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकणे या प्रमुख धरणांमध्ये सध्या अत्यंत मर्यादित पाणी साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीतील हा शिल्लक साठा नाशिककरांना केवळ ६० दिवस पुरू शकतो; मात्र ऑगस्ट महिन्या अखेरपर्यंतचा विचार केला तर अजून ७८ दिवस पाणी पुरवावे लागणार आहे. परिणामी, ऑगस्टअखेरपर्यंत नाशिक शहराला तब्बल १८ दिवसांच्या पाण्याची मोठी तूट जाणवणार आहे. हीच १८ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी आणि उपलब्ध पाणी ऑगस्टअखेरपर्यंत पुरवण्यासाठी महापालिकेला हे कडक पाऊल उचलावे लागले आहे.

 पाणी कपातीचे असे असेल वेळापत्रक:

जून आणि जुलै २०२६ : या दोन महिन्यांत प्रत्येक शनिवारी शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.

ऑगस्ट २०२६ : ऑगस्ट महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार असल्याने थेट 'दोन दिवसाआड' पाणी कपात केली जाईल. ऑगस्ट महिन्यातील १, ४, ७, १०, १३, १६, १९, २२, २५, २८ आणि ३१ या तारखांना शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

'अल-निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पाऊस लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही परिस्थिती पाहता नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना खालील गोष्टींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे:

१. पाणी जपून वापरा: पिण्याचे आणि वापराचे पाणी अत्यंत काटकसरीने खर्च करा.

२. साठवणूक व्यवस्थित करा: पाणी कपातीच्या दिवसांचे नियोजन करून पाणी व्यवस्थित साठवून ठेवा, जेणेकरून गैरसोय होणार नाही.

३. अपव्यय टाळा: वाहने धुणे, अंगणात पाणी मारणे यांसारख्या गोष्टींसाठी पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळावा.

"धरणांमधील पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. १८ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी ही कपात अपरिहार्य आहे. नाशिककरांनी प्रशासनाला सहकार्य करावे."

— पाणी पुरवठा विभाग, नाशिक महानगरपालिका.

Advertisement

Comments

No comments yet.