जयपूर, (प्रतिनिधी) १५ जून - देशभरात गाजत असलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून राजस्थानच्या जयपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. 'कॉकरोच जनता पक्षा'चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात तरुणाने थेट हल्ला करत त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे आंदोलनस्थळी प्रचंड गोंधळ उडाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
खांद्यावरून नेतानाच केला हल्ला
नीट पेपरफुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील 'जंतर मंतर' आणि पुण्यात यशस्वी आंदोलन केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके हे राजस्थानच्या जयपूरमधील आंदोलनासाठी पोहोचले होते. या आंदोलनासाठी शेकडो तरुणांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलनस्थळी पोहोचताच तरुणांनी दीपके यांचे जंगी स्वागत केले. काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले होते. नेमका याच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात तरुणाने पुढे येत अभिजीत दीपके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हल्लेखोराला कार्यकर्त्यांनी चोपले; दीपके यांचे संयमाचे आवाहन
हा अचानक झालेला हल्ला पाहून आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी तातडीने त्या हल्लेखोर तरुणाला जागीच घेरले आणि त्याला चोप देण्यास सुरुवात केली. यामुळे मैदानावर काही वेळ प्रचंड गोंधळ आणि पळापळ झाली. स्वतःवर हल्ला झालेला असतानाही अभिजीत दीपके यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच अभिजीत दीपके यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या गंभीर धमकीनंतर पोलिसांनी त्यांच्या घराभोवती कडक बंदोबस्तही तैनात केला होता. धमकीची टांगती तलवार असतानाही दीपके देशभरात फिरून तरुणांच्या न्यायासाठी आंदोलने करत आहेत. मात्र, आता थेट जयपूरमधील आंदोलनातच त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळे राजकीय नेत्यांच्या आणि आंदोलकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.