वॉटरप्रूफ मंडप, तात्पुरती शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी आणि मोफत वैद्यकीय सेवा.... आषाढी वारीत मिळणार आणखी या सुविधा...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १० जून - आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तब्बल ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या निधीला प्रशासकीय मान्यताही मिळाली असून जिल्हा परिषदेमार्फत ही कामे युद्धपातळीवर केली जाणार आहेत.

जिल्ह्यातील 'या' प्रमुख पालख्यांना होणार फायदा

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जगद्गुरू संत निवृत्तिनाथ महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्यासह इतर अनेक लहान-मोठ्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यांचे आणि त्यासोबत चालणाऱ्या वारकऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना जिल्ह्यात उत्तम सुविधा देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

निधीतून वारकऱ्यांसाठी 'या' सुविधा उभारणार:

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वारकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली होती. या मंजूर निधीतून खालील सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत:

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरती शौचालये, स्नानगृहे व स्वच्छतागृहांची निर्मिती.

शुद्ध आणि मुबलक पिण्याच्या पाण्याची चोवीस तास व्यवस्था.

Advertisement

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी फिरती वैद्यकीय पथके आणि आवश्यक औषधांचा पुरवठा.

पावसापासून संरक्षणासाठी ठिकठिकाणी जलरोधक (Waterproof) मंडप उभारणी.

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार!

मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकाराने प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पालख्या आणि वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यंदा या कामांना अधिक गती मिळणार आहे.

प्रतिक्रिया:

"आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पालख्यांचे महत्त्व विशेष आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. वारीचे गांभीर्य ओळखून त्यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."

— राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री, अहिल्यानगर)

Advertisement

Comments

No comments yet.