या गावानं करून दाखवलं... गेल्या दोन वर्षात एकही... इतर गावेही घेणार आदर्श...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

धाराशिव, (प्रतिनिधी) १७ मे - बालविवाह मुक्तीच्या दिशेने पावले टाकणाऱ्या महाराष्ट्रासाठी धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी गावाने एक अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक उदाहरण समोर आणले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने आणि ‘अंगाई-युनिसेफ’ (Angai-UNICEF) च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या व्यापक जनजागृती मोहिमेमुळे गेल्या दोन वर्षांत आंबेवाडी गावात एकही बालविवाह झाला नसल्याची कौतुकास्पद माहिती युनिसेफने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या अभियानातून सामाजिक परिवर्तन
आंबेवाडीमध्ये घडलेल्या या परिवर्तनामागे विद्यार्थ्यांचा पुढाकार सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. गावात सलग दोन वर्षांपासून ‘उत्सव समतेचा’ आणि ‘मीना राजू मंच’ ही अभियाने प्रभावीपणे राबविली जात आहेत. या मोहिमेत केवळ आंबेवाडीच नव्हे, तर धाराशिव जिल्ह्यातील १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सक्रिय सहभागी झाले आहेत. या मोहिमेला ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ (SSP), ‘कोरो’ आणि ‘मावा’ या स्थानिक सामाजिक संस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.

ढोल-ताशांच्या गजरात रॅली आणि गावाची सामूहिक शपथ
गावात आयोजित ‘उत्सव समतेचा’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे, लेझीम, पथनाट्ये आणि गाण्यांच्या माध्यमातून बालविवाह, लैंगिक भेदभाव आणि मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती केली. ‘बालविवाह बंद करा’ आणि ‘मुलींना शिक्षण द्या’ अशा घोषणा देत संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली.

Advertisement

या मोहिमेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे, गावातील मंदिर परिसरात सर्व नागरिकांनी एकत्र येत बालविवाह रोखण्याची आणि प्रत्येक मुलीला उच्च शिक्षणाची संधी देण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी भावूक होत गावातील एका आजींनी सांगितले, "माझं लग्न लहान वयात झालं होतं, पण माझ्या नातीला मी तसं आयुष्य जगू देणार नाही, तिला मी शिकवणार."
आता मुलं स्वयंपाक करतात आणि मुली फुटबॉल खेळतात!

शाळांमध्ये केवळ व्याख्याने न घेता नाटक, वादविवाद आणि भूमिका परिवर्तन (Role Reversal) यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश रुजवला जात आहे.
"आमच्या शाळेत आणि घरात आता मोठा बदल झाला आहे. आता मुलं स्वयंपाकघरात मदत करतात आणि मुली मैदानावर फुटबॉल खेळतात. शिक्षणाचा आणि समानतेचा हा संदेश आता आमच्या गावाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे."
— समीक्षा, (इयत्ता ८ वी, आंबेवाडी)

अंगाई-युनिसेफच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या आशा-आकांक्षांना पंख मिळाले असून, आंबेवाडी गावाने राज्यासमोर ठेवलेला हा 'बालविवाह मुक्तीचा' पॅटर्न इतर गावासांठीही दिशादर्शक ठरणार आहे.

Comments

No comments yet.