जळगाव, (प्रतिनिधी) ६ मे - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये, यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून 'आपुलकी' हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत असून, याअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना पुण्यातील नामवंत संस्थेत मोफत निवासी शिक्षणाची संधी मिळणार आहे.
'स्नेहवन' संस्थेशी जिल्हा प्रशासनाचा करार
या उपक्रमासाठी पुणे येथील 'स्नेहवन' या सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले आहे. ही संस्था २०१५ पासून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत आळंदी (पुणे) येथील निवासी शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत निवासी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही संस्था उचलणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता आणि अटी:
१. विद्यार्थी हा अनिवार्यपणे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असावा.
२. प्रवेश केवळ इयत्ता पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे.
नोंदणीची प्रक्रिया आणि अंतिम मुदत
ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या पाल्यांची नोंदणी १५ मे २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. इच्छुक पालकांनी तात्काळ आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावच्या खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
दूरध्वनी: ०२५७-२२२३१८० / ०२५७-२२१७१९३
संस्था संपर्क: ७८७५५०१५०२
संकेतस्थळ: www.snehwan.in
"शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे, हाच 'आपुलकी' प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.