दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी... या तारखेला लागणार निकाल... मिळणार हायटेक गुणपत्रिका...

Share:
Main Image
Last updated: 28-Apr-2026

पुणे, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. बारावीचा निकाल ५ मेपर्यंत आणि दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यंदापासून गुणपत्रिकांच्या स्वरूपात मोठा बदल करून बोर्डाने बनावटगिरी रोखण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

बनावटगिरीला बसणार कायमचा चाप

अनेकजण बोर्डाचा बनावट लोगो वापरून प्रमाणपत्रे तयार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बोर्डाने यंदापासून गुणपत्रिका (Marksheet) आणि बोर्ड प्रमाणपत्र (Certificate) स्वतंत्र न देता एकाच पानावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या गुणपत्रिकेची वैशिष्ट्ये:

विद्यार्थ्याचा फोटो: गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्याचा फोटो असेल.

क्यूआर कोड (QR Code): प्रत्येक गुणपत्रिकेवर एक विशेष क्यूआर कोड असेल. तो स्कॅन करताच विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती समोर येईल.

एकत्रित कागद: प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका एकाच पानावर असल्याने पडताळणी करणे सोपे होईल.

सध्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून गुणपत्रिकांची छपाई युद्धपातळीवर सुरू आहे. निकालानंतर साधारणतः एक महिन्याने विद्यार्थ्यांना ही नवीन स्वरूपातील मूळ गुणपत्रिका हातात मिळेल.

Advertisement

१७ मेपासून अकरावी प्रवेशाचा 'श्रीगणेशा'

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, म्हणजेच १७ मेपासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू होणार आहे.

ऑनलाइन सोय: विद्यार्थ्यांना सुरुवातीला ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत.

पारदर्शकता: कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी संख्येत तफावत राहू नये, तसेच विद्यार्थी केवळ कोचिंग क्लासेसला न जाता महाविद्यालयात उपस्थित राहावेत, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने कडक नियोजन केले आहे.

निकालाचा अंदाजित कार्यक्रम:

परीक्षा निकाल तारीख (अंदाजित)

बारावी ५ मे २०२६ पर्यंत

दहावी १५ मे २०२६ पूर्वी

अकरावी प्रवेश नोंदणी १७ मे पासून

Comments

No comments yet.