शाळांमध्ये विद्यार्थांची होणार ही चाचणी... नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश....
Last updated: 15-Dec-2025
नाशिक (प्रतिनिधी), दि. 10 डिसेंबर - नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी शासानाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समिती (Task force) आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, सहाय्य्क आयुक्त (नगरविकास) शाम गोसावी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळू पाटील, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साळवे, ग्रामीण समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजेता साळुंखे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, ॲड. सुवर्णा शेपाळ यांच्यासह सर्व आरोग्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सर्व आरोग्य यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले की आरोग्य व शिक्षण हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे आहेत. आरोग्य सेवा देण्यात नाशिक अग्रस्थानी राहील यादृष्टीने सर्वकष प्रयत्न आवश्यक आहेत. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची अंमलबजावणी करताना सोनोग्राफी केंद्रासह, शरीर तपासणीची (स्कॅनिंग) ठिकाणांची नियमित तपासणी करावी. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत दाखल गुन्हांचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांच्या आरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. शिबिरांच्या आयोजनापूर्वी नागरिकांना अवगत करण्यासाठी ठिकाठिकाणी जनजागृती करावी. क्षयरोग, कृष्ठरोग निर्मूलनासाठी गृहभेटीद्वारे रूग्णांची तपासणी करावी. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक मोतिबिंदू शस्त्रक्रियांसाठी शिबिरे आयोजित करावीत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील बालकांची नेत्रतपासणी करून मोफत चष्माचे वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मलेरिया व डेंग्यूचे आजार टाळण्यासाठी फवारणीसह गप्पी मासे पाळण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. रेल्वेमार्गांच्या लगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिकनगुनियाचे प्रमाण सर्व्हेनुसार अधिक आढळून आले आहे. अशी लगतची गावे व वस्त्यांच्या ठिकाणी रूग्ण तपासणी नियमित करावी. साथरोग प्रतिबंधासाठी ज्या ठिकाणी यात्रा, सण व उत्सवाच्या निमित्ताने स्थलांतरीत नागरिक येतात त्यांची आरोग्य तपासणी करावी. तसेच त्यांच्यासह असलेल्या बालकांची लसीकरणासाठी विशेष आरोग्य शिबिर अयोजित करावे. निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांच्या पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणीही वेळोवेळी करावी.
एचआयव्ही बाधित रूग्णांना सर्व प्रकराच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे वेबिनार आयोजित करून नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करावी. या रूग्णांना मोफत स्वत धान्य, आयुष्यमान भारत कार्ड व इतर आरोग्यविषयक सुविधा उपलब्य करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. रूग्णांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांद्वारे सुचीबद्ध करण्यात येणाऱ्या रूग्णालयांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आशा कार्यक्रम, इ-सुश्रृत, इ-संजीवनी ओपीडी, सिकलसेल मिशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम यांचाही आढावा यावेळी घेतला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिंदे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपयायोजनांची माहिती यावेळी सादर केली.
Comments
No comments yet.