जनगणनेच्या कामात दिरंगाई नको... सुटीच्या दिवशीही काम करा... बदली नाही, चुकांना माफी नाही...

Share:
Main Image
Last updated: 19-Apr-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १९ एप्रिल - आगामी जनगणनेच्या अनुषंगाने सुरू असलेले घरयादी गट निश्चितीचे आणि नकाशांचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात योग्य ती दक्षता घेऊन ते विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आणि जनगणनेचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुका आणि नगरपरिषदनिहाय कामाचा सविस्तर आढावा घेतला. ज्या तालुक्यांचे व शहरांचे काम संथ गतीने सुरू आहे, त्यांनी सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवून २० एप्रिलच्या आत ते पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या आणि कामात पुरेशी प्रगती न दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement

जनगणनेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांची माहिती सीएमएमएस पोर्टलवर सोमवार सकाळपर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही माहिती भरताना जे कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत किंवा जे वैद्यकीय रजेवर आहेत, त्यांची नावे वगळण्याची दक्षता घ्यावी. पोर्टलवरील माहिती एकदा अंतिम केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे सर्व तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या माहितीची अचूकता तपासावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जनगणनेचे अधिकारी श्रीकांत बनकर यांनी पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षकीय मंडळ तयार करताना एका प्रगणकाला साधारणपणे आठशे ते नऊशे लोकसंख्येचे समान काम दिले जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण २३ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रशिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दोन तुकड्या एकत्र न करता, प्रत्येक तुकडीचे स्वतंत्र प्रशिक्षण घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे प्रशिक्षणापूर्वीच वितरित करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

No comments yet.