नागपूर, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - अंमली पदार्थ तस्करीविरोधात केंद्र सरकारने पुकारलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत महसूल गुप्तचर यंत्रणेने (DRI) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमा भागातून मध्य भारत व राजस्थानकडे होणारी आंतरराज्यीय तस्करी मोडीत काढत, DRI च्या मुंबई विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १,२५१ किलो (सव्वा टन) गांजा जप्त केला. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ६.२५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
आल्याच्या पोत्यांमध्ये लपवला होता साडेतीन कोटींचा गांजा
पहिली मोठी कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवरून मध्य प्रदेश-राजस्थानच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो जीपला DRI अधिकाऱ्यांनी अडवले. या वाहनाची सखोल तपासणी केली असता, अधिकाऱ्यांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. तस्करीसाठी वाहनात आल्याच्या ७२९ किलो वजनाच्या ५३ पिशव्या ठेवल्या होत्या, ज्यामध्ये गांजाची १४२ पाकिटे अत्यंत शिताफीने लपवण्यात आली होती. या मालाची किंमत ३.६४ कोटी रुपये आहे.
या कारवाईत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत वाहन आणि गांजा जप्त करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये या आंतरराज्यीय टोळीचा मुख्य म्होरक्या असून तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता.
कूलर आणि ब्लँकेटच्या आड तस्करी
दुसरी कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील भागीमहारी टोल नाक्यावर करण्यात आली. ओडिशा सीमा भागातून आलेल्या एका ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये कूलर, टेबल फॅन आणि ब्लँकेटच्या खाली लपवलेली गांजाची १०० पाकिटे आढळली. या साठ्याचे वजन ५२२ किलो असून त्याची किंमत २.६१ कोटी रुपये आहे. या प्रकरणी देखील दोन जणांना अटक करून वाहन जप्त करण्यात आले आहे.
तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार
राज्यांच्या सीमा ओलांडून होणाऱ्या संघटित अंमली पदार्थ तस्करीविरोधात DRI ने केलेली ही लागोपाठची कारवाई मोठे यश मानले जात आहे. या कारवाईतून केंद्राच्या 'नशामुक्त भारत' अभियानाप्रती असलेला निर्धार स्पष्टपणे दिसून येतो.