मुंबई, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका 'इंद्रायणी' आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एका नव्या मालिकेच्या आगमनासाठी वाहिनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, लाडक्या 'इंद्रायणी'ला अचानक निरोप द्यावा लागत असल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
अल्पावधीतच जिंकली होती मने
'इंद्रायणी' या मालिकेतील बालकलाकाराचा निरागस अभिनय आणि ग्रामीण भागातील कथानकामुळे या मालिकेने महाराष्ट्रातील घराघरात स्थान निर्माण केले होते. मालिकेची टीआरपी (TRP) देखील उत्तम असताना अचानक मालिका बंद करण्याच्या निर्णयाने प्रेक्षक चक्रावून गेले आहेत.
नव्या मालिकेसाठी 'इंद्रायणी'चा बळी?
मिळालेल्या माहितीनुसार, कलर्स मराठी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या नव्या मालिकेसाठी प्राइम टाइमच्या वेळेत बदल करण्यात आले असून, त्या जागी जुनी मालिका गुंडाळली जात असल्याची चर्चा मनोरंजन विश्वात रंगली आहे. वाहिनीने अद्याप अधिकृतपणे यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी, नव्या मालिकेच्या प्रमोशमुळे 'इंद्रायणी'ची एक्झिट निश्चित झाली आहे.
प्रेक्षकांची भावना
मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, कलाकारांनी सेटवरील काही भावूक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "एवढ्या लवकर ही मालिका बंद व्हायला नको होती," अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपला हळहळ व्यक्त केली आहे.