नाशिक,(प्रतिनिधी) दि.१२ जानेवारी २०२६ – नाशिक शहरामध्ये अफाट क्षमता आहे. त्यातुलनेत नाशिकचा विकास सध्या होत नाहीय. मात्र, महापालिकेत सत्ता येताच नाशिकच्या विकासाला वेग दिला जाईल. दादासाहेब फाळके स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान साकारले जाईल, नाशिक दर्शन बस पुन्हा सुरू केली जाईल, प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांना नाशकात संधी दिली जाईल तसेच नाशिकची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नाशिक मेट्रो साकारली जाईल, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, आल्हाददायक वातावरणासाठी जगभर ख्यात असलेली नाशिक नगरी ही माझी कर्मभूमी आहे. याच नगरीने मला देशात नेतृत्व करण्याची संधी दिली. माननीय छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आपल्याला नाशिक आणखी अग्रेसर करायचे आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कितीतरी विकासकामे करायची आहेत. असंख्य सोयी-सुविधा निर्माण करतानाच हा ग्लोबल सोहळा निर्विघ्न संपन्न होईल यासाठी कटीबद्ध व्हायचे आहे. आगामी दीड वर्षात आपल्याला हे शिवधनुष्य पेलायचे आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेत योग्य नेतृत्व आणि सक्षम सत्ताधारी हवेत. माननीय छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शना आणि संकल्पनेतून साकार झालेल्या प्रकल्पांची देखभाल उत्तम होणे आणि नवीन प्रकल्प साकारणे यासाठी उत्साही आणि सर्वोत्तम व्यक्तीची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक शहराचे अनेक प्रश्न आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही, ऑनलाईन कामकाजाचे बारा वाजले आहेत, विकासकामांसाठी पैसा उपलब्ध नाही, उद्यानांची दुरवस्था, मैदानांची अनुपलब्धता, रस्त्यांची बिकट अवस्था अशा असंख्य समस्या आहेत. या सर्वांवर आपल्याकडे तोडगा आहे. ज्या पद्धतीने येवला परिसराचा अक्षरशः कायापालट करण्यात आला तसेच नाशिकमध्ये घडवायचे आहे. यापूर्वी आपण प्रत्यक्ष विकासकामे केली. त्यानंतर ती सांगितली. आताही आपण जे करणार आहोत तेच सांगत आहोत. आता इथून पुढे आपल्याला अधिक गतीने आणि चौफेर विकासवारी घडवायची आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, स्वच्छता, साहित्य-संस्कृती, क्रीडा, महिला-बालकल्याण अशा सर्वच क्षेत्रात आपल्याला अमुलाग्र बदल घडवायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक महापालिकेचा कारभार अवघ्या एका क्लिकवर आणायचा आहे. घरबसल्या अर्ज आणि प्रमाणपत्र हे प्रत्यक्षात साकारायचे आहे. रस्ते, पाणी, वीज यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयांवर तक्रार करण्याची वेळ येऊ नये असे चित्र आपल्याला निर्माण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची भक्कम साथ हवी आहे. आगामी सिंहस्थ आणि नाशिकच्या विकासाची भरारी लक्षात घेऊन नाशिककर योग्य तो निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांना येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. लवकरच आपण विजयी उमेदवारांसह प्रत्यक्ष कामाला सुरूवात करू या, असा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.